Thursday, 28 September 2017

स्वच्छ भारत मोहिम २०१९

सत्तारुढ भाजप सरकारनं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत मोहिम सुरू केली आहे. २०१९ पर्यंत संपूर्ण देश चकाचक करण्याचं हे लक्ष्य आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. पण केवळ लक्ष्य चांगलं असून चालत नाही. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होणं हे त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मोदींनी ज्या काही क्रांतिकारक गोष्टी अलीकडच्या तीन वर्षांत केल्या त्यांत अनेक त्रूटी आहेत. नोटाबंदीचा निर्णय हा असाच एक चांगला पण अंमलबजावणीत फसलेला निर्णय होता. जीएसटीची कल्पना चांगली असली तरी ती योजना आणताना प्रचंड घाई करण्यात आली. त्यामुळे लोकांना स्वस्ताई मिळेल अशी अपेक्षा होती ती देखिल फोल ठरली आहे. कारण सामान्य माणूस अजूनही महागाईशी लढतोच आहे. बुलेट ट्रेन गुजराथ-महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यांत आला आहे. पण त्याची खरीच आवश्यकता आहे का आणि त्यानं अपेक्षित अशी विकासाला चालना मिळणार आहे का याबाबतही शंकाच आहे. नदी जोड प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतला आहे. हा प्रकल्प भारतातीलच नाही तर कदाचित जगातील सर्वांत महागडा प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे. बरं इतका मोठा प्रकल्प करून अपेक्षित ध्येय साध्य होईल का हा प्रश्न आहेच. त्यापेक्षा कमी खर्चांत, कमी वेळेत, पर्यावरणाची कमी हानी करून, लोकांना कमी त्रास देऊन, अनेक चांगल्या जलसंधारणाच्या योजना राबवणं शक्य असूनही भाजप अशा दिखावू मोठ्या योजना का आणत आहेत हे कोडंच आहे. स्वच्छ भारत मोहिम ही अशीच एक योजना आहे. देश काही एका ठराविक वेळेत स्वच्छ होऊ शकणारी गोष्ट नाही. आपण रोजच कचरा करत असतो आणि स्वच्छताही रोजच करावी लागते. त्यामुळे २०१९ पर्यंत देश स्वच्छ करणं ही घोषणाच मूळात विरोधाभासी आहे. तेही एकवेळ मान्य केलं तरीही भारतासारख्या देशात जिथे लोक स्वतःच्या घरापलीकडे स्वच्छतेला महत्त्व देत नाही, तिथं ही मोहिम राबवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. इथं तर लोक घरातही स्वच्छता ठेवत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमुळे घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांवरच असते. पुरुष त्यात मदत करत नाही. म्हणजे देशातली अर्धीअधिक लोकसंख्या तशीही स्वच्छतेत सहभागी होतच नाही. आता या महिलांनी देशही स्वच्छ ठेवायचा अशी अपेक्षा करणं जरा जास्तच होईल. पुरुष मग काय करणार आहेत तर ते घाण करण्याची आपली जबाबदारी निष्ठेनं पार पाडणार आहेत. कारण आजवर त्यांनी तेच केलं आहे. हा देश स्वच्छ करायचा असेल तर प्रत्येकालाच योगदान द्यावं लागणार हे नक्कीच आहे. पण त्यासोबतच काही कठोर निर्णय घेऊन त्यांची सक्तीनं अंमलबजावणीही करावी लागणार आहे. कचरा, घाण करणा-या लोकांना जबरी आर्थिक दंड बसल्याशिवाय हा प्रश्न काही सुटण्याची शक्यता नाही. भारतीय लोकांची मानसिकता वगैरे सुधारण्याची वाट पाहिली तर मात्र देशाची वाट लागण्याची शक्यताच जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की इथं काहीच चांगलं घडत नाही. काही लोक प्रयत्न करत आहेत. पण ते फार अपुरे ठरताहेत. आपणही आपल्या परीनं आपली जबाबदारी उचलायला हवीच. पण हे कायमस्वरुपी काम आहे, हेही लक्षात ठेवायला हवं. कोणत्याही प्रलोभनाशिवाय, बक्षिसाशिवाय, योजनेशिवाय स्वच्छ भारत मोहिम सुरू ठेवणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. हे व्हावं अशी आशा आहे. 

No comments:

Post a Comment