Thursday, 25 May 2017

भाग १ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

काही दिवसांपूर्वी पुण्यात के. सच्चिदानंदन हे केरळमधील कवी, लेखक व सामाजिक कार्यकर्ता एका कार्यक्रमासाठी आले होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आणि दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांच्या पार्श्वभूमिवर साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करून जो निषेध केला होता त्यात सच्चिदानंदन यांचाही समावेश होता. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भारतातील अनेक क्षेत्रांतील समविचारी लोकांची एक संघटना तयार केली आहे. त्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर लिहायला सांगून त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ते आहे – वर्ड मॅटर्स – रायझिंग अगेन्स्ट द सायलेंस. या पुस्तकाच्या निमित्ताने साधना मीडिया सेंटरने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात भारताची सध्याची परिस्थिती फॅसिझमला अनुकूल आहे का की इथे याआधीच फॅसिझम येऊन पोहोचलाय याविषयी सच्चिदानंदन यांना पाटील यांनी उंबेर्तो इको या इटालियन लेखक, विचारवंताच्या - उर फॅसिझम - या पुस्तकाचा संदर्भ देत प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर हो असं देत सच्चिदानंदन यांनी त्याचं स्वरुप आणखी काही उदाहरणं देत स्पष्ट केलं होतं. त्याला अनुसरून ही पोस्ट आहे. इकोच्या मूळ पुस्तकात फॅसिझम कसा ओळखावा याची १४ सूत्रे दिली आहेत. त्यांच्या अनुषंगाने ही पोस्ट लिहीली आहे. जिज्ञासू मूळ पुस्तक वाचू शकतात ते एमेझॉनवर आहे. किंवा गुगलवर शोध घेऊन याविषयी अधिक माहिती घेता येईल. ज्यांना आपली मते या विषयावर द्यायची आहे त्यांचं स्वागत आहे.
मोदींशी माझे काही व्यक्तिगत हेवेदावे नाहीत की ते भाजप व संघाशी संबंधित आहे म्हणून मी आंधळेपणानं त्यांचा विरोधही करीत नाही. प्रत्येकात बरे-वाईट गुण असतात व त्यानुसारच त्या व्यक्तिचा विचार करायला हवा असं माझं मत आहे. त्यामुळे मोदींच्या चांगल्या गोष्टींना माझा पाठींबा आहे, स्वच्छ भारत योजना, गंगा स्वच्छ मोहिम किंवा अन्य योजना. आता त्या यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ मोदी किंवा त्यांच्या सरकारची नसून ती प्रशासनाची व लोकांचीही असते. त्यावरच कोणत्याही योजनेची यशस्विता ठरत असते. त्याचवेळी मोदी सरकारच्या नेतृत्वकाळात गोध्रासारखं जे प्रकरण घडलं किंवा नंतरच्या काळात जी अनेक प्रकरणं घडली त्याचाही मला विसर पडलेला नाही. हा लेख तटस्थपणे लिहिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला आहे. व्यक्तिगत पातळीवर कोण कोणत्या पक्षात आहे याचा विचार मी करीत नाही. पण जेव्हा ती व्यक्ति संस्थेशी जोडली जाते तेव्हा अशा हजारो व्यक्तिंच्या समावेशामुळे एखाद्या संस्थेची विशिष्ट विचारधारा तयार होते जिचा सामना करणं कठीण जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मी बोलत आहे. पण केवळ तेच नाही तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अन्य हिंदू समित्या, मुस्लिम जातीयवादी संस्था, किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या, जातीच्या संस्था, संघटना जेव्हा एकांगी, दुराग्रही, देशविघातक भूमिका घेऊन कार्य करते तेव्हा तेव्हा हा फॅसिझमचा धोका जाणवत असतो. मोदी स्वतः, त्यांचे सरकारातील लोक आणि भाजप व संघाशी संबंधित अन्य लोक यांच्या ज्या प्रकारच्या वल्गना सध्या सुरू आहेत व त्याला ज्या पद्धतीने अन्य लोकांकडून उत्तरे दिली जात आहेत, व या एकूण प्रकारात सामान्य जनता ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे हे सारेच या देशासाठी, इथल्या लोकांसाठी, इथल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अगदी स्पष्टपणेच सांगायचं तर मोदी किंवा भाजप यांच्याविषयी काळजी करण्याचं काही एक कारण नाही. हे राजकीय पक्ष आहेत आणि त्यांना सत्ता सांभाळताना लवचिकपणे कसं वागावं हे समजतं. आपण ते बघतही आहोत. त्यांची कितीही इच्छा असली तरी त्यांना मनमानी करता येणार नाही. पण जेव्हा संघ किंवा त्यांच्याशी संबंधीत अन्य संघटना अथवा अन्य कोणत्याही जातीयवादी संघटना उघडपणे हे करा किंवा ते करू नका असले सल्ले देतात आणि त्याविरूद्ध जाणा-या लोकांचे जीव घेण्यापर्यंतही त्यांची मजल जाते तेव्हा ती अत्यंत धोकादायक बाब असते. राष्ट्रभक्ती किंवा अन्य कोणत्याही विचारधारेत गुंडाळलेली वचने असोत त्यातील छुपा अर्थ वेगळा तर नाही ना हे तपासून पाहण्याची गरज आहे. आता कोणी असंही म्हणेल की मी आधीच काही संस्थांना फॅसिझमवादी म्हणून मोकळा होतोय आणि मग त्यात निष्पक्षता कोठे आली आहे?  आता या संघटना कट्टरतावादी आहेत यात माझा दोष नाही. त्यामुळेच त्यांची नावं मी घेत आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे फक्त याच नव्हे तर अन्य संघटनांचाही मी यात समावेश केला आहे. त्यात अगदी खाप सारख्या जातपंचायती ज्या आपल्या देशात सगळीकडेच आहेत त्यांचाही समावेश होता. त्यात फतव्यांचाही समावेश होतो. उंबेर्तोच्या सूत्रांनुसार असा काही प्रकार या देशात कोणाकडून होतोय का याची फक्त ही तपासणी आहे. आणि तसं जर ते नसेल तर चांगलंच आहे. पण ते तसं असेल तर त्यासाठी बचावाची यंत्रणा उभारण्यात आपण तयार असलं पाहिजे. माझ्या प्रत्येक सूत्रावरील लिखाणात हा मुद्दा मी अधिक स्पष्ट करेन.
फॅसिझम म्हणजे एक विशिष्ट दुराग्रही एकांगी विचारसरणी असा अर्थ घेऊन इथे त्याविषयी भारताच्या सध्याच्या परिस्थितीविषयी काही सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी अभ्यासू संशोधक नाही. ही म्हटली तर माझी उणीव आहे किंवा म्हटलं तर एका अर्थानं ते उपयुक्तही ठरेल कारण मी जे संदर्भ देईन ते माझ्याशी संबंधित असतील. एखादा मुद्दा मांडल्यानंतर त्याचा माझ्याशी प्रत्यक्ष कितपत संबंध येतो हे महत्त्वाचं आहे. उदा. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं आपण म्हटलं तर त्याचा माझ्याशी कितपत संबंध आहे हे मला सांगता येईल. म्हणजे मी जर सामाजिक माध्यमांवर या विषयावर लेख लिहू शकत असेन तर मी या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं थेट म्हणू शकत नाही. याचा अर्थ या देशात सारं ठिकठाक आहे असाही होत नाही. मी कदाचित नगण्य आहे त्यामुळे कोणाचं माझ्याकडे लक्ष जाणार नाही पण उद्या ते गेलं तर सरकार किंवा अन्य संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित लोक माझ्याविरूद्ध शांतपणेच वागतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे इथे भविष्याचाही संबंध येतो. हा लेख या सर्व गोष्टींचा विचार करून लिहिलेले आहेत. या देशातील एक नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदा-या असतात. आपण असू म्हणूयात की हा त्याचाच एक भाग आहे. मला काही एक धोका वाटतोय म्हणून मी काही मतं व्यक्त करून त्याविषयी लोकांना काही सांगू इच्छितो, त्याचा काही उपयोग झाला तर चांगलच आहे. ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्या अनुषंगानेही हा लेख वाचण्यात यावा.
उंबेर्तो इकोचा जन्म १९३२ ला इटलीत झाला होता. त्यामुळे लहानपणापासून बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिझमशी त्यांचा जवळून संबंध आला होता. मुसोलिनी मेल्यानंतरही हा फॅसिझम जीवंत राहिल्यामुळे आणि अन्यत्रही त्याचा अन्य रुपांमध्ये उदय झाल्यामुळे त्यांनी नंतरच्या काळात त्याविषयी आग्रही भूमिका घेत आपला विरोध कायम ठेवला. नंतर त्याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण असे – उर फॅसिझम किंवा इटर्नल फॅसिझम अर्थात शाश्वत फॅसिझम हे पुस्तकही लिहिले. त्यात फॅसिझम हा मेलेला नाही आणि आता तो वेगवेगळ्या स्वरुपांत जगभरात वावरत आहे हे त्यांनी सांगितलं तसेच तो ओळखण्यासाठी १४ सूत्रे सांगितली. जी अतिशय चपखल आहेत. आपल्या देशात, आपल्या सभोवती फॅसिझम किंवा तत्सम परिस्थिती आहे की नाही हे शोधण्यासाठी त्यांचा निश्चित उपयोग होऊ शकतो. इको हे अतिशय प्रगल्भ लेखक होते. त्यांची द नेम ऑफ द रोझ, फोकॉल्ट्स पेंडुलम, द आयलँड ऑव्ह द डे बिफोर, द प्राग सेमिटेरी ही काही गाजलेली पुस्तके. त्यांचा चिन्ह व सांकेतिक भाषांचा दांडगा अभ्यास होता आणि आपल्या पुस्तकात त्यांनी त्याचा उपयोग केला आहे.
इको त्याच्या या पुस्तकात फॅसिझमविषयी लिहिताना म्हणतो की, फॅसिझमचे अनेक ऐतिहासिक प्रकार अस्तित्वात असले तरी त्याच्या काही वैशिष्ट्यांची नोंद करता येऊ शकते ज्यावरून या शाश्वत फॅसिझमची ओळख पटू शकते. या वैशिष्ट्यांना एक संघटीत स्वरुप नाही, त्यातील अनेक मुद्दे एकमेकांच्या विरोधातही जातात आणि त्यातील काही मुद्दे अन्य हुकुमशाही किंवा कट्टरतावादी विचारसरणीशी साधर्म्य सांगू शकतात. पण यातील एकही वैशिष्ट्य जर आपल्याला दिसत असेल तर हा फॅसिझम त्याच्या भोवती वाढू शकतो जर त्याला वेळीच अटकाव करण्यात आला नाही तर. हा फॅसिझम सध्या अत्यंत साध्या स्वरुपात आपल्या अवतीभवती वावरत असू शकतो. तो ओळखनं खूप सोपं गेलं असतं जर कोणी असं म्हटलं असतं की, मला पुन्हा छळछावण्या उघडायच्या आहेत किंवा काळा पोषाख घालून संचलन करायचं आहे.पण आयुष्य इतकं साधं सरळ नसतं. सध्याच्या काळात फॅसिझम अत्यंत निरागस स्वरुपातही आपल्यापुढे येऊ शकतो. आपल्या सर्वांचं कर्तव्य असायला हवं की त्याला उघडं पाडायचं आणि त्याचा तिथल्या तिथे विरोध करायचा, मग तो जगाच्या कोणत्याही भागात असो. स्वातंत्र्य आणि उदारता यांची जपणूक करणं, संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची सर्वोच्च जबाबदारी असायला हवी.

मी यापुढे इकोने जी १४ सूत्रे दिली होती ती इंग्रजीतील खाली जशीच्या तशी दिली आहेत. त्याविषयीचं भाष्य मी तेवढं पुढे लिहिलं आहे. 

No comments:

Post a Comment